भारताची संरक्षणयंत्रणा सक्षम   

ले. ज. (नि.) राजेंद्र निंभोरकर (ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ)

‘ऑपरेशन सिंदूर’ व नंतरही घडलेल्या घटनांमधून भारताची युद्धसज्जता आणि वाढते मनोबल भारतीयांना आश्वासित करुन गेले ही चांगली बाब आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला तणाव संघर्ष बंदीनंतर काही प्रमाणात निवळला. भारताने  आपण केवळ व्याप्त काश्मीर प्रश्नावरच चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. अन्य बाबींवर चर्चा करण्यास नकार दिला. असे असताना नजिकच्या भविष्यात दोन्हीपैकी एकही देश आक्रमक भूमिका घेणार नाही, असे वाटते. याचे कारण भारत आपल्याला कठोर उत्तर देऊ शकतो हे पाकिस्तानला आता समजले आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडवणे आणि कोठेही लपला तरी आम्ही शोधून मारु, हे आपण त्यांना प्रत्यक्ष कृतीतून सांगितले आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती आता निवळली आहे, असे म्हणता येईल. अर्थात या स्थितीमध्ये अन्य देशांनी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बदलू शकते. जसे की, चीनने स्वार्थासाठी युद्धजन्य स्थिती कायम राहण्यासाठी प्रयत्नशील होणे नाकारता येणार नाही. मात्र तूर्तास तरी परिस्थिती ‘जैसे थे’ राहील असे वाटते.
 
दरम्यान, ताज्या घटनेवर अनेकजण अनेक प्रकारची मते व्यक्त करताना दिसत आहेत. संपूर्ण विजयाच्या स्थितीत असताना संघर्षबंदी केल्याबद्दल काहीजण सरकारला दोषी धरत आहेत. चांगली संधी गमावल्याबद्दलचा रागही काहीजणांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. मात्र आपल्याला नेमके काय पाहिजे होते, हे ते विसरतात. पाकिस्तानला अद्दल घडवायची म्हणजे व्याप्त काश्मीर घ्यायचे, पाकिस्तानचे तुकडे करायचे, त्यांना नष्ट करायचे हे करणे अशांना अपेक्षित होते का? माझ्या मते असे बोलणारे अविचारी आहेत, कारण पाकिस्तानला नष्ट करणे, व्याप्प्त कश्मीर  ताब्यात घेणे हे होऊ शकत नाही. शेवटी तो देखील ३० कोटींचा देश आहे. त्यांचे सहा लाखांचे लष्कर आहे. लष्कर,नौदल,हवाई दल असे संरक्षण विभाग त्यांच्याकडेही आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ते निश्चितच थोडक्यात आटोपणार नाही. तूर्तास तरी पाकिस्तानला सज्जड दम भरण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे. आपण आपली ताकद दाखवली आहे.
 
यापुढे जाऊन समजा संधी साधत आपण पाकिस्तानला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? खात्रीने हा अण्वस्त्रधारी देश अस्तित्व जपण्यासाठी निकराचा प्रयत्न करेल. यावेळी त्यांनी १२० पैकी दोन अण्वस्त्रांचा वापर केला तरी आपले किमान दोन कोटी नागरिक  मृत्युमुखी पडतील. दुसरीकडे आपल्याकडून होणार्‍या हल्ल्यात त्यांचेही तेवढेच नुकसान होईल. हे आपल्याला करायचे आहे का? याचे उत्तर या लोकांनी द्यावे. त्यांना संपवले पाहिजे, उडवले पाहिजे अशी विधाने  अविचारी स्वरुपाची वाटतात. थोडे ज्ञान आणि विश्लेषणात्मक अभ्यास असणारे कोणीही असे कधीच म्हणणार नाहीत.
 
आज गेलो आणि उद्या व्याप्त काश्मीर ताब्यात घेतले, असे कधीही होणार नाही. त्याला किमान महिना लागेलच; खेरीज नुकसान किती होईल, हे सांगता येणार नाही. दोन बॉक्सर रिंगमध्ये गेले आणि चांगल्या बॉक्सरने दुसर्‍याला आठ ठोसे मारले तरी त्याला दोन तरी सहन करावे लागतील, ही साधी गोष्ट आहे. हे दोन ठोसे सुद्धा वर्मी लागू शकतात. नुकसान करु शकतात, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. दुसरे म्हणजे, आपण व्याप्त काश्मीर ताब्यात घेतले, तरी तेथील जनता खरोखरीच आपल्याबरोबर येणार का, हा प्रश्न आहेच. मागील ७० वर्षे काश्मिरी जनतेला आपल्यामध्ये सामावून घेण्याचा संघर्ष सुरू आहे. अजूनही अडचणी संपलेल्या नाहीत.  ही बाबही लक्षात घ्यायला हवी. मग हे नवे दुखणे परवडेल का, याचा विचार बेधडक मते मांडणार्‍या प्रत्येकाने करायला हवा. स्थानिक लोक बरोबर येत नाहीत, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. तणाव कायमच राहील. इथे बांगलादेशचे उदाहरण देवून चालणार नाही, कारण तेव्हा तेथील शंभर टक्के जनता आपल्याबरोबर होती. म्हणूनच आपण ते करु शकलो. आज तशी परिस्थिती नाही. 
 
माझ्या मते, सध्याच्या कृतीतून भारताने पाकिस्तानला आणि जगाला योग्य तो संदेश दिला आहे. आपली मुत्सद्देगिरीही जगाने पाहिली आहे. आपण कोणापुढे वाकलो नाही. मान ताठ ठेवून तसेच जागा न सोडता भूमिका निर्भिडपणे मांडली. त्यामुळेच पाकिस्तानला शस्त्रसंधीची याचना करत भारताकडे यावे लागले. आपण त्यांना हे करण्यास भाग पाडले. हाच आपला मोठा विजय आहे. तेव्हा यापुढे आणखी ताणण्यात अर्थ नव्हता.
 
या संपूर्ण कारवाईसाठी आपली अतिप्रगत संरक्षणप्रणाली उपयुक्त ठरली.  एस ४०० या प्रणालीद्वारे क्षेपणास्त्रे दुरुनच हेरुन नष्ट केली जातात. ताज्या हल्ल्यामध्ये ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसली. खेरीज एन-७० गन क्षेपणास्स्त्र शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर मारा करुन ते नष्ट करु शकते. अशा अनेक प्रणालींचा वापर करुन जम्मू, अमृतसर, पठाणकोट, राजस्थान अशा भागांमध्ये प्रयत्न करुनही पाकिस्तान आपले कोणतेही नुकसान करु शकला नाही. प्रतिक्रिया देत आपणही त्यांच्या भागात घुसून, विशेषत: लाहोरमध्ये तेथील रडार यंत्रणा संपवून टाकल्या. यात पाकिस्तानचे नुकसान झाले. कराची बंदरावर हल्ला केल्याने तेथेही भरपूर नुकसान झाले. नौका, जहाजे नष्ट झाली.  या हल्ल्यात आपण त्यांच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले. ही बाब पाकिस्तानला मोठा धक्का देणारी ठरेल. 
 
बहावलपूर येथे अतिरेक्यांचा खूप मोठा तळ आहे. आपण तेथे हल्ला केला. लाहोरमध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केला. सरगोधा येथील त्यांच्या प्रमुख एअर बेसवर हल्ला केला. इस्लामबादमध्ये मोठी हानी घडवून आणली. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. थोडक्यात, हल्ले आणि प्रतिहल्ल्याच्या या धामधूमीत आपले काही नुकसान झाले नाही, पण पाकिस्तानला मात्र मोठी किंमत चुकवावी लागली. आक्रमण होत असल्याचा अंदाज घेणारी ‘अर्ली वॉर्निंग अँड कन्ट्रोल सिस्टीम’ (अवॉक्स) उद्ध्वस्त केली जाते, तेव्हा तो देश संरक्षणदृष्ट्या आंधळा झाल्यासारखी स्थिती होते. त्यांचे रडार काम करत नाहीत. अशी त्यांची एक यंत्रणा आपण उद्ध्वस्त केली. पाकिस्तानकडे अशा आणखी दोन यंत्रणा आहेत. मात्र त्यातील एक आधीच निकामी आहे. त्यामुळे त्या देशाची स्वसंरक्षणाची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यांची एक बाजू लंगडी करुन आपण हे मोठे यश मिळवले आहे, असे म्हणावे लागेल. या सुनियोजित हल्ल्यांमध्ये आपल्या तीनही सशस्त्र दलांची अत्यंत चांगली कामगिरी बघायला मिळाली. कारवाईत सूसूत्रता दिसली. जगातील सर्वोत्तम शक्तींपैकी एक असल्याचे आपण दाखवून दिले. 
 
या सगळ्याची सुरूवात करणार्‍या व्यक्तीचे,  मनोहर पर्रिकर यांचे आभार मानायला हवेत.  ‘राफेल’ काय करु शकते, हे आपण बघितले आहे. एस ४०० प्रणाली देखील अशीच आहे.. मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या काळातच या सगळ्याचे सखोल विश्लेषण केले होते. लष्कराच्या मुख्यालयात कार्यरत असल्यामुळे माझे त्यांच्याशी बरेचदा बोलणे व्हायचे. ते हवाईदल आणि लष्करातील उच्चपदस्थांबरोबर बसून कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे जातीने जाणून घ्यायचे. स्वाभाविकच दर्जेदार संरक्षण सामग्री मिळाल्याने संरक्षणव्यवस्थेची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकली. म्हणूनच आज शत्रूशी दोन हात करताना भारताची मजबूत स्थिती दिसत असेल तर त्याचे श्रेय पर्रिकर यांना द्यायलाच हवे.

(शब्दांकन: स्वाती पेशवे)

 

Related Articles